नवी दिल्ली: करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात थैमान माजवलेला असतानाच आता करोनाची तिसरी लाट देशात येणार आहे. येत्या 6 ते 8 आठवड्यात देशात करोनाची तिसरी लाट येणार असून ही लाट रोखणे अशक्य असेल, असा इशारा एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे. देशातील जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करणे हे मोठे आव्हान आहे. कोविशिल्ड व्हॅक्सिनच्या दोन लसींच्या दरम्यान गॅप वाढवण्यात आला आहे. ते चुकीचे नाही. उलट त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना वाचवता येणार आहे, असे रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केले. रणदीप गुलेरिया यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना तिसऱ्या लाटेचा इशारा दिला. आपण अनलॉक करायला सुरुवात केली आहे. मात्र, पुन्हा एकदा कोविड प्रोटोकॉलची कमतरता भासत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटे दरम्यान जे झालं त्यातून आपण अजूनही धडा घेतलेला नाही. पुन्हा गर्दी वाढत असून लोक जमायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर करोनाची संख्या वाढण्यास वेळे लागेल. येत्या सहा ते आठ आठवड्यात हे होऊ शकतं किंवा त्याला विलंब होईल, असे गुलेरिया यांनी स्पष्ट केले. आपण कोविड प्रोटोकॉलचं पालन कसं करतो आणि गर्दीवर नियंत्रण कसे आणतो, यावर बरंच अवलंबून आहे. आतापर्यंत देशाच्या लोकसंख्येपैकी केवळ 5 टक्के लोकांनाच दोन डोस मिळाले आहेत. त्यामुळे वर्षअखेरीस 108 कोटी लोकांना लस देण्याचे आव्हान सरकार समोर आहे. हेच मोठं आव्हान आहे, असे त्यांनी सांगितले. नवी लाट साधारणपणे तीन महिन्यासाठी असेल. मात्र, वेगवेगळ्या फॅक्टर्सनुसार हा कालावधी कमीही असू शकतो. कोरोना नियमांचे पालन करणे सक्तीचे आहेच. पण सावध राहणंही तेवढंच महत्त्वाचे आहे. मागच्या वेळी आपण नवा व्हेरिएंट पाहिला. बाहेरून आलेला हा व्हेरिएंट आपल्याकडे विकसित झाला होता, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा